फॉलोअर

मायेचा हळवा मोती...

मायेचा हळवा मोती...

नंदाबाईने स्टोला हवा मारून, मारून पेटवले होते. पण तो चांगला चालतच नव्हता. तसेच खिचडीचे पातेले त्यांनी त्यावर ठेवले. मग हळूहळू शिजू लागली.मध्येच तो भडकत ही होता.त्यामुळेच पातेले सगळे खालून काळे झाले होते. 

खिचडी शिजेपर्यत त्या हातात कापूस घेऊन वाती करू लागल्या.वात करता करता तोंडाने देवाचे भजन किंवा अभंग असेकाही तरी गुणगुणत राहण्याची त्यांना आवड होती.

म्हणून..
 १)जसे येथून दिसती पंढरी काळी निळी। कुरूंदाचे जाते रखुमाई बुक्का दळी।

२)देवा मधी देव, असा मारुती ब्रह्मचारी। 
मातेच्या समान वाटे याला, अवघ्या नारी।


नंदाबाई ह्या एकट्याच राहत होत्या. घरात दुसरे कोणीही नव्हते. म्हणजे त्यांना मुल वगैरे काही झालेले नव्हते. घर अगदी छोटेच होते.किराया ची रूम होती.

 जेव्हापासून नंदाबाईचे पती वारले. तेव्हापासून असं हे अस्थिर जगणं त्यांचं.. झालं होतं.

 जमापुंजी जवळ अशी काहीच नव्हती. मिळेल तसं काम. आणि होईल ते काम करायचं. अगदी पोटापुरतेच. वयही बरेच झाले होते.


 नातेवाईक होते. पण जवळ अशी फारसे कोणी नव्हते. कदाचित मूलं झाले नाही. म्हणून ही असेल कदाचित..!असते तर गोतावळा ही झाला असता भरपूर. पण नाही..


तशीच, थोडी कच्चीच खिचडी त्यांनी खाल्ली. कारण स्टो मध्येच भडकून, शांत झाला होता. म्हणून त्यांनी ही त्याला काही करायचा प्रयत्न केला नाही. 'उद्या दुरुस्ती वाल्याला नेऊन दाखवावा लागेल.'असे मनातल्यामनात म्हणून मनाचे समाधान करून घेतले. 'आणि उद्याचा हा आगाऊ खर्च करावाच लागेल, नाहीतर उपाशीच राहायला लागेल.'


 असं म्हणून, त्यांनी जेवण झाल्यावर पातेले आणि ताट घासून टाकले. आणि त्या थोडे बाहेर ओट्यावर येऊन बसल्या.कारण, दुसऱ्या मैत्रिणी तिथेच गप्पा मारत बसल्या होत्या. गप्पा हा बहाना होता. उद्याचे कोठे काम मिळते का? तेही पाहायचे होते.


बसल्यावर शेजारच्या घरातली साजिरी वहिनी बाहेर आली. म्हणाली," नंदा मावशी, तुमचा फोन आला आहे."

 जे नातेवाईक होते. त्या सर्वांना साजिरी वहिनी चा नंबर नंदाबाईने दिलेला होता.



 म्हणून त्यावर फोन येत होते.
" कोणाचा आहे?" नंदा वहिनीनी
 विचारले. 
 "माहित नाही. साजिरी वहिनी म्हणाली,
"हा हॅलो कोण." नंदाबाई ने विचारले.

"अगं मी, आत्या मी बोलते आहे अनुराधा."तिकडून आवाज आला.

"आले लक्षात, बोल कशी आठवण काढलीस ?"नंदाबाई म्हणाल्या.
"आता ऐक, उद्या तू जशी असशील तशी, इकडे निघून ये. असा जणू आदेशच अनुराधा ने त्यांना दिला दिला होता.
"का ग बरं नाही का? तुला की आणखी कोणाला?" काळजी युक्त स्वरात नंदाबाई म्हणाल्या. 
"तसं काहीही नाहीये, आम्ही सगळे अगदी ठणठणीत आहोत. उद्या सकाळीच निघ. म्हणजे जेवायला इथेच ये. मी वाट पाहिल. त्याशिवाय जेवणार नाही." झालं.. असं म्हणून तिने फोन ठेवूनही दिला. यांना काही बोलताच आले नाही.

अनुराधा ही नंदाबाईच्या भावाची मुलगी. चार भावात, सगळ्यात लहान ही बहीण होती. म्हणून खूप सगळ्यांची लाडकी होती. आता पुण्यामध्ये राहत होती लग्नानंतर.


अनुराधेचे वडील आणि नंदाबाई सख्खी बहीण भाऊ. दोघांनीही एकमेकां ना कधीच अंतर दिले नाही. त्यात यांना मुल झाले नाही, म्हणुन भावाने जास्त जवळ केले.अडचणीच्या वेळी कायम ही बहीण हजर असायचीच.


काही वर्षा पुर्वी वहिनीला बरं नव्हतं. म्हणजे अनुराधाच्या आईला. म्हणून अनुराधाच्या बाळंतपणाला नंदाबाई तिच्या घरी. म्हणजे पुण्याला गेल्या होत्या. त्यानंतर आताचं हे जाणं.
.'नकोच म्हणायला पाहिजे होतं. पण तिनं काहि बोलुच दिले नाही.त्यामुळेच आता जावेच लागेल.'

दुपारचे दोन वाजलेले होतो.
नंदाबाई अनुराधाच्या घरी पोहोचल्या.प्रवास ठीक झालेला होता. पण पोटात मात्र भूक लागली होती. कारण घरी, चहाचा कप सुद्धा.. त्यांना घेता आला नव्हता.

 पण निघताना.. साजिरी वहिनीने चहा दिलाच होता. तिचं नेहमीच असं होतं.. या एकट्याच राहत होत्या. शिवाय जवळचा असं कोणीही, जवळ नव्हंत. त्यामुळे ती हवं, नको विचारत असे. येताना आता स्टो तिच्याकडेच नंदाबाई ठेवून आल्या होत्या.' दुरुस्त कर ' असंही हक्काने सांगितलं होतं.

"येऽऽ किती दिवसांनी भेटतो आहोत ना आपण." असं म्हणून आनुने नंदाबाईला मिठी मारली. आणि त्या क्षणी त्यांचा प्रवासात आलेला क्षीण, थकवा 50% कमी झाल्यासारखा त्यांना वाटला. कारण प्रेमाची व्यक्ती भेटली की खुपच बरे वाटते.

 नंतर जेवण करून झाल्यावर,
 "दुपारचा आराम कर." असं अनुने त्यांना बजावून सांगितलं."आलीस ना आता, अजिबात कशाचा विचार करायचा नाही. मस्त खायचं, प्यायचं आणि आराम करायचा आहे. तुला आता इथे."
 असं ऐकून त्या म्हणाल्या," तू मला काहीतरी काम आहे. म्हणून बोलावलं आहेस ना.. नाहीतर जावईबापू काय म्हणतील मला."
 " ते काहीही म्हणणार नाहीत तुला." अनु म्हणाली. 

तर अनुराधाची ही नंदा आत्या.. काधीही, केव्हाही, ती तीच्या भावाच्या कुटुंबासाठी, हाक द्यायचा उशीर, की तत्परतेने हजर होत असे. आई बाबांचे दुखणेखुपणे असो, की एखादे फंक्शन असोऽऽ त्यामध्ये याच असायच्या. पुढे वहिनींच्या बाळंतपणासाठीही आणि अनुच्या दुसऱ्या बाळंतपणातही. ह्याच तिची काळजी घ्यायला. लेकराला तेल मालिश करून न्हाऊ घालायला याच होत्या. ते दुसरे बाळ म्हणजे 'मंजिरी'.ही आता सात वर्षाची होती.

 तिच्यापेक्षा मोठा मुलगा म्हणजेच,' कान्हा' हा दहा वर्षाचा होता. आणि अनुराधाचे मिस्टर कंपनीत चांगल्या पोस्टवर होते. तर असे हे कुटुंब होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी जरा भरभरच अनुने सगळी काम आवरली. सगळी काम आटोपली आणि लवकर दुपारचे जेवणही झाले.
 तिने आत्याला, "बाहेर जायचं आहे, तयार हो." सांगितले. आणि छान नवीन साडीही त्यांना नेसायला दिली. 
"अगं कशाला? माझ्याकडे आहे ना साडी." आत्या म्हणाली.
"अगं नाही आत्या. मी तुझ्यासाठीच आणली आहे. घाल नवी साडी. आज आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत." अनुराधा उत्तरली.
"आपण दोघीच का? मुलं आणि जावई?" आत्याने प्रश्न विचारला. तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच अनु म्हणाली, "मुले शाळेत गेली आहेत. पण मंजिरी येणार आहे आत्ता. कान्हाला साडेतीन-चार वाजतात. हे पण ऑफिसला गेले आहेत त्यांना सुट्टी नाही. तेव्हा आपणच जाणार आहोत."

नंदाआत्या अनुराधा आणि मंजिरी अशा या तीन पिढीच्या तीन नारी..

फुले, प्रसाद घेऊन रांगेत उभ्या राहिल्या,गर्दी जास्त नव्हती."आत्या तू रांगेत उभी राहू शकशील ना? नाहीतर तू कुठेतरी बसतेस का?" अनुनी आत्याला विचारले.
"नाही. नको. जरा कष्ट पडू देत की या देहाला. सहज नाही भेटत गं. देव चिमणे." आत्या म्हणाली.

 हळूहळू नंबर आला, आणि आत्या, हात जोडून बाप्पा समोर , निर्विकार चेहऱ्याने उभ्या राहिल्या. त्या मनात देवाशी संवाद करत होत्या.. 'जणू देवा स्वप्नातही वाटले नव्हते. तुमचे दर्शन मला होईल. चित्रात आणि टीव्हीतच मी तुमचे दर्शन घेतले होते. खरंच आजचा दिवस माझा खूप धन्य झाला. असंच आता लवकर तुझ्याकडे मला यायचं आहे' असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब गालांवरूनओघळले.त्यानंतर त्यांनी डोळे उघडले. आणि बाप्पाच्या
चरणावर आपले डोके ठेवून दर्शन घेतले. खूप समाधानी आणि प्रसन्न वाटत होतं त्यांना.


 दर्शन घेऊन तिघीही मंदिरातुन बाहेर आल्या. त्यानंतर मंजिरी, "डोसा खायचा" म्हणाली. आत्यालाही नाश्ता खाऊ घालायचाच होता. "आत्या तू काय खाणार"? अनुने विचारले.
" ऐकऽऽ, मला असं काही खायची सवय नाही." आत्या म्हणाली.
"आम्हाला तरी कुठे आहे? आम्ही पण कधीतरी खातो." तिने सांगितले.आणि डोसा ऑर्डर केला.
आत्याने खूप आवडीने डोसा खाल्ला. त्यांना तो खाताना पाहून. अनुच्या मनात मात्र गहिवर दाटला होता. हळवा मनाचा कोपरा आज थोडासा उजळला होता.

रविवारी सगळ्यांनी मिळून जाण्याचा बेत केला. मिस्टर, मुलं, आत्या सगळेच.

 आत्याला पर्वती दाखवायची होती. 

तसंही दोनदाच अनुही पर्वतीला गेलेली होती. पुण्यात आल्यावर एकदा आणि त्यानंतर एकदा.


 मुलांनाही इतिहासाची ओळख होईल. आणि त्यातील वैभव पाहण्यात येईल. 



 पर्वतीच्या पायऱ्या चढून, सगळ्यांची दमछाक झाली. पण तेथील महादेवाच्या, भवानी मातेच्या आणि विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात दर्शन घेताना थोडा थोडा विसावाही घेतला.


 त्यामुळे थकवा जाणवला नाही. पुढे पेशवाईचे संग्रहालय पाहत असताना थकवा पळून गेला.


 कर्तुत्ववान आणि वैभवशाली इतिहास पाहताना, आणि मराठा साम्राज्य वाढवणारे बाजीराव .यांचा इतिहास पाहत असताना, 


'आपण वेगळ्याच जगात आहोत की काय?' 


असे क्षणभर भासले.


 परत येताना शनिवार वाडा ही पाहायचे ठरवले होते म्हणून तिकडेही गेलो.


 भव्य असा तो दरवाजा पाहून अनुने आत्याला विचारले,

"कसा आहे आत्या हा दरवाजा?"


"मस्तच आहे गं. भला मोठा हा दरवाजा. आपल्या घराचे दार तर जोरात एक लाथ मारली. तरी तुटून पडेल पण हे म्हणजे..??" 


शनिवार वाडा पाहत असताना, लाकडावर केलेले सुबक असे कोरीव काम पाहून, कारागीरांच्या हातातील कौशल्यावर गर्व वाटला.



वाडा पाहून आम्ही परतलो. पण येताना, बाहेरच जेवून यायचे असे ठरले होते. आत्याच्या आवडीची केशरी बासुंदी आणि गुलाबजाम ऑर्डर करायचे होते.

"अगं कशाला बाई एवढं करतीस? घरी जाऊन, स्वयंपाक करून जेऊ की." आत्याबाई म्हणाली.

 "नाही आत्या, ते काही नको, तुला येथेच मला जेऊ घालायचे आहे. तू नाही का आम्हाला सगळ्यांना कधीकधी गरम गरम जेवू घातले आहेस. तेव्हा तुझं, मी काहीच ऐकणार नाही. जेव आता." अशी जवळ जवळ अनुने तिला ताकीदच दिली.

 तेव्हा ती जेवू लागली.


आणि असेच आत्याला आग्रहाने बरेच दिवस तिने ठेवून घेतले.



 त्यादरम्यान..

 "तुला काय आवडते।."

 असं सहजपणे विचारून घेई.किंवा 'मामांना काय आवडत होते.'

आणि तो पदार्थ मग करून आग्रहाने तिला पोटभर खाऊ घालायची. तो खाताना आत्याला भरून येत होतं. आणि मग मामांसोबतचे (त्यांचे पति) आनंदाचे क्षण तिला आठवत असत. त्या वेळेला, मलाही माझ्या आयुष्यातील, काही कोडी नव्यानेच उलगडत असे.



मग थोडे थांबुन परत म्हणाल्या,

"माझे एवढे कोणी लाड आणि कोड कौतुक केले नव्हते गं. तु एवढे करते आहेस."


 "असू दे गं.तुला आनंद वाटतोना?मग मलाही.असेच तुझे आशिर्वाद असुदे माझ्याबरोबर." अनु .


"ते तर आहेतच."आत्याबाई. 


 "हे केल्याने मी काय झिजले क? तू तर किती झीजायला पाहिजे मग… आम्हा सगळ्यांचे करून." अनु म्हणाली.


" काहीतरीच असतं तुझं तर, माझी माणसं होती म्हणूनच मी.." 

"आणि म्हणूनच मी पण, तू नाहीस का माझी?"

 त्यांचं वाक्य पूर्ण होण्याअगोदरच अनु उत्तरली.

 हे ऐकून, नंदाबाई काहीच बोलल्या नाहीत.



या दिवसात आत्याचे तिने मेडिकल चेकअप ही करून घेतले. त्यात बीपीची एक. त्यांची छोटी गोळी त्या रोज घेत होत्या तेवढीच होती. बाकी काहीही नाही.


  असे बघून. अनुला आणि नंदाताईलाही खूप छान वाटलं, खूप हायसं वाटलं.




पण ही बाई कामाची. हिला रिकामा बसवत नव्हतं. म्हणून बाईने हिला वर्षभर पुरतील एवढ्या वाती करून दिल्या. फुलवाती सुद्धा. काही वाळवण देखील केलं होतं.


उद्या, उद्या करत एक महिना, अनुने ढकलला.


 मात्र त्यानंतर ती त्यांला म्हणाली," दादा येणार आहे. आता तुला न्यायला त्यांच्याकडे. कान्हाचा बर्थडे आहे. दोन दिवसानंतर. त्यासाठी दादा येणार आहे. आणि तुलाही घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. म्हणाला, 'आई बाबा गेल्यापासून घरात मोठा माणूस राहिला नाही.' म्हणून, तुला घेऊन जाणार आहेत त्याच्याकडे ."


दोन दिवसानंतर. दादा येऊन आत्याला घेऊन गेला.


 पण आयुष्याच्या मखमली पेटीत एक आठवण.जी सदैव प्रेरणा देत राहील. अशी तिने जपून ठेवली होती आत्याच्या 'मायेचा हळवा मोती' जणू तिने त्या पेटीत ठेवला होता. म्हणून, मनाला एक समाधान मिळाले होते. चलाऽऽ..


सौ. शुभांगी सुहास जुजगर. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या