फॉलोअर

बहरला हा मधुमास : भाग ३

 बहरला हा मधुमास : भाग ३



अभयने तिला तिच्या अपार्टमेंटच्या गेट जवळ सोडले.आणि "पुन्हा भेटूच"असे म्हणुन त्याने बाय केले अन् तो निघून गेला.आता पुढे..


अभयला बाय करून, सई घरी आली. जय आलेला होता. 

"अग काय ताई! एकटीच कुठे गेली होतीस?" त्याने तिला विचारले.

"अरे तुला सांगितले ना, की सकाळी कॉलेजचा मित्र भेटला होता म्हणून. तोच आला होता. तर त्याच्यासोबतच गेले होते." सईनी सांगितले.

"हो रेऽ, मी पण भेटले त्याला सकाळीच. छान वाटला मला. म्हणूनच मी जा म्हणाले." आईनेही तिचे मत मांडले.

"इथे पुण्यात असतो का? काय करतो?" जय चे हे प्रश्न.

 "हो कंपनीत आहे. सर्व्हिसला."सई ने सांगितली.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात

सई अंथरुणावर लोळत पडली होती. सगळे झोपले होते. जय आणि आई दोघेही.

पण हिला काही झोप येईना; प्रयत्न करूनही सारखी सारखी अभय बरोबरच्या गप्पांची आंदोलनं, तिच्या मन: पटलावर येत राहीली.

' हे असं का?' कॉलेजला असताना अभयला भेटले की तिलाही काहीतरी त्याच्याबद्दल वाटत होतं.तिच्याही नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. त्याची भेट अगदी पंधरा दिवसानंतर होत असेल. पण ती भेट मनात हुरहुर निर्माण करत असायची. ही लागलेली हुरहुर मग दुसऱ्या वेळेस भेटल्यानंतर शांत होत असायची.


 वडील गेल्यानंतर सई कॉलेजला गेलीच नाही. त्यामुळे भेट झाली नाही. भेटच नाही तर या विषयावर पडदाच पडला होता. ती त्याला साफ विसरून गेली होती.

पण आज अचानक नियतीने या दोघांची भेट घडवून आणली होती. 'हे असं का?' हाच प्रश्न तिला झोपू देत नव्हता. मग असा विचार करत करतच निद्रा देवीने तिला आपल्या कुशीत घेतले. केव्हा हे तिलाही कळले नाही.


सईला झोपेत स्वप्न पडले. त्यामुळे तिला जाग आली. तिने इकडे तिकडे पाहिले, तर अंधार होता. मग तिने घड्याळ बघितले, तर पाच वाजले होते. म्हणजे तिला साडेचार ते पाच या दरम्यान हे स्वप्न पडले होते. तशीही ही तिची दररोजची वेळ होती उठण्याची. पण कोणीच उठले नव्हते. हे पाहून ती परत अंथरुणावर आडवी झाली.पण परत उठून बसली. बसल्या बसल्या तिने गणपती बाप्पाला हात जोडले. कदाचित रात्री आईने सांगितले होते की, 'सकाळी आपल्याला बाप्पाच्या दर्शनाला जायचे आहे.'

'म्हणूनच हे स्वप्न आपल्याला पडले असावे.' असं तिनं मनाला समजावले.आणि हे तिला पडलेले स्वप्न ती पुन्हा पुन्हा आठवु लागली.

तर स्वप्नात, 'गणपती बाप्पा समोर ती हात जोडून उभी होती. तर गणपतीच्या मूर्तीवरचे लाल गुलाबाचे फुल तिच्या दिशेने खाली पडले.' हे तीने पाहिले आणि तिला जाग आली.

काही वेळानंतर आई उठली. "आईऽ आई इथे माझ्याजवळ बस ना थोडा वेळ."

"सकाळीच कुठे, बसायला वेळ असतो का? तुझं आपलं…"

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


तिचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच सई म्हणाली," बस ना मला काहीतरी सांगायचं आहे तुला."

सकाळीच काय सांगायचे आहे तुला एवढे?" आईने विचारले.

"अगं आई, मला ना एक स्वप्न पडले. आणि तेही पहाटे पहाटेच."

"होय का! पहाटेची स्वप्ने खरी होतात. असं म्हणतात."

"पण काय पडले तुला स्वप्न?"

"आपण बाप्पाच्या दर्शनाला गेलो. मी हात जोडून बाप्पा समोर उभी राहिले. तर मूर्ती मूर्तीवरील एक लाल गुलाबाचे फुल माझ्याकडे पडले."तीने सांगितले.

"बरोबर. असेल काही संकेत बाप्पाचा." असे म्हणत तिनेही बाप्पाला हात जोडले.

अन् म्हणाली,"देवा पोरीने खूप कष्ट केले आहेत आतापर्यंत. पण आता, तिच्या वाट्याचे सुख तिच्या पदरात घाल म्हणजे… "

मध्येच सई म्हणाली,"असं काय म्हणते आहेस गं?"

"मला काय संकेत मिळायचा तो मिळाला. तुला नाही कळणार. चल आवर बरं आपल्याला बाहेर गणपतीच्याच दर्शनाला जायचे आहे लवकर."

 असं म्हणत आई तिचे आवरण्यासाठी निघून गेली.

 आई तिथून गेली पण हिला आपलं उगीचच, चुकल्यासारखं वाटायला लागले.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


"अभय चल नाश्ता करायला." अभयच्या आईने त्याला किचनमधून हाक मारली.

"हो आलोच. दोन मिनिट." अभय ने सांगितले. आणि तो पाच मिनिटानंतर किचनमध्ये आला. आईने त्याच्या हातात पोह्याची प्लेट दिली. मस्त त्यावर खोबरे आणि कोथिंबीर भुरभुरलेली होती. सोबत लिंबू पण दिले होते. "आज पोहे छानच झाले आहेत आई." अभयने पोहे खात खात आईला सांगितलं. "अरे दररोज कुठे असे नाश्त्याला होते. डब्यासाठी भाजी पोळी होते. तीच नाष्ट्यासाठी ही." आईने सांगितले.

"हो आई, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. कधी येतेस माझ्याबरोबर?" अभयने आईला विचारले.

"कधी म्हणजे, तुला कधी वेळ असेल तेव्हा. चल माझं काय? काम लवकर आवरेल किंवा नंतर करेन."

 "हो मग येशील ना? नक्की, त्याने परत खात्री करून घेतली. आणि तो पुढच्या तयारीला लागला. पण आज शनिवार होता, म्हणून त्यांनी उद्या म्हणजेच रविवारी आईला घेऊन सई कडे जायचे ठरवले. घरी गेल्यावर, तिच्या आईची आणि भावाची ही ओळख होईल. म्हणून मग नाश्ता झाल्यावर, त्यांनी सईला फोन केला. आणि सांगितले की,

"माझ्या आईला तुला आणि तुझ्या आईला भेटायचे आहे."

 "हो ये ना मग. पण कधी येतो?" तिकडून सैईने विचारले.

"उद्या चालेल. आज मला काम आहे."

"हो. मी म्हणजे मग आम्ही, घरीच थांबतो, सई म्हणाली. अभयलाही जरा हायसे वाटले.


अभय त्याच्या आईला घेऊन येणार.! म्हटल्यावर, जयने नाश्त्यासाठी बाहेरूनच मागवले.घरात तो एकटाच राहत असल्याने सुविधा उपलब्ध नव्हती.पण वेळ साजरी करायची होती.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात

दोघेही येऊन बसले. सगळ्यांनाच खूप बरे वाटले. छान गप्पा झाल्या.सई सोबत, आई सोबत, आणि जय सोबत. त्यानंतर नाश्त्याचा प्रोग्राम झाला. या सर्वात सईची तत्परता, स्वभावातील आपलेपणा, विशेष म्हणजे संकटकाळी खंबीर होऊन, तिने कुटुंब सावरले होते. आणि आज भावाला, इंजिनियर केले होते. हीच बाब त्यांना अतिशय कौतुकास्पद वाटली. या गप्पांच्या ओघात ईशाचाही विषय निघाला. तीही जवळच राहते आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला. हेही तिला कळले सर्व गप्पामुळे अधिकच जवळीक निर्माण झाली. हे सर्व झाल्यावर अभयला काय वाटले; काय माहित! तो म्हणाला, "चला आपण सर्वजण बाहेर फिरून येऊ. तुम्हाला काही काम नाही ना?" जय कडे पाहत अभय म्हणाला.तेवढेच त्याला, 'सई बरोबर आणखी वेळ मिळेल.' असे त्याला वाटले.

"नाही काही कामे नाहीत." जय म्हणाला.

 "तुम्ही तयार व्हा सगळे, तोपर्यंत मी आईला गच्चीवर घेऊन जातो." 

असं म्हणून तो आईला घेऊन गच्चीवर आला. वर आल्यावर त्याने आईला विचारले,"आई, 

सई कशी वाटते आहे तुला?"

 "कशी म्हणजे? पोरगी छान आहे रे, गुणी तर आहेच. शिवाय हुशारही आहे." आईने तिचे मत नोंदवलले. 

थोडं थांबून त्या म्हणाल्या,"अशीच तर मुलगी, मी तुझ्यासाठी बघते आहे."

"हो ना. मग हेच बघ ना." अभय म्हणाला.

"अरे लबाडाऽ, असा आहे होय." आई म्हणाली.

"नाही, असं काही नाही. तुला जे वाटले नाऽ, अशीच मुलगी पाहिजे. तर मलाही तेच वाटले. इतकेच."

"अरे कसं जमेल? पण ते कोण, आपण कोण?अशा अनेक अडचणी आईने त्याच्यासमोर ठेवल्या.

यावर अभय म्हणाला,"आपण या सगळ्या अडचणीवर मात करू. ही मला खात्री. पण तू फक्त हो म्हण. तर मग पुढचं सगळं सोपं होऊन जाईल.

"अस्संऽ" आई म्हणाली.

तेव्हा त्याला बरे वाटले.


सगळेजण मस्त बागेत फिरत होते. एन्जॉय करत होते. पण अभय मात्र 'सईशी कसं बोलावं?' याचाच विचार करत होता. 

फिरत फिरत सई गुलाबाच्या झाडाजवळ थांबली. आणि फुलांचे निरीक्षण करू लागली. हे अभयने पाहिले. आणि तो तिच्या जवळ आला.अन् तिला म्हणाला,"एवढे बारीक काय बघते आहेस?"

"काही नाही,किती सुंदर फुले आहेत ना ही.अगदी छान टवटवीत." सई म्हणाली.

"छान आहेत,अगदी तुझ्या सारखी."तो असं म्हटल्यावर ती जरा लाजली. 

पण तरी म्हणाली,"तुझं तर कांहीतरीच." 

"मी आपलं सहजच बोलुन गेलो."

"असं होयऽऽ."ती.

"अगं खरंच,तु फुलासारखी नव्हेस तर त्यापेक्षाही सुंदर आहेस.आणि म्हणुन तु मला आवडली आहेस."

"नाही, असं काही पण बोलू नकोस.चार चौघासारखे काही तरी बोलावं."ती जरा सावरून म्हणाली.

"हो सई, तु माझ्याशी लग्न करशील?"त्याने 

कुठलाही आडपडदा न ठेवता सरळच विचारले.


भाग १

भाग २

सौ. शुभांगी सुहास जुजगर. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या