फॉलोअर

मोगरा फुलला मोगरा...

 मोगरा फुलला,मोगरा...



दारासमोरील अंगणात काहीतरी निवडत बसलेल्या चिमाबाई..

सगळ्या लेकी आपापल्या संसाराला लागल्या होत्या. आणि त्यात त्या रमल्या होत्या.म्हणून ह्या निवांत होत्या. आपल्या लाडक्या लेकाची म्हणजे गोविंदाची वाट पाहत…


इतक्यात गोविंदाची स्वारी उगवली. आणि तो त्याला मिळालेली ट्रॉफी आईच्या पुढ्यात धरत म्हणाला,”आई बघ आज मला हे पारितोषिक भेटले आहे.”

“वा वा ! खूप छान बेटा, खुप खुप अभिनंदन तुझे. असाच शिकून आणखी मोठा हो. पण हे आधी देवघरात रामा जवळ ठेव. आणि त्यांचे आशीर्वाद घे.”

  आई असं म्हटल्यावर गोविंदाने ती ट्राफी घरातील भगवान श्रीरामा जवळ ठेवुन, मनोभावे नमस्कार केला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

गोविंदाला ही ट्रॉफी बी.ए. ला विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल देऊन गौरविण्यात आलेले होते. तो ट्रॉफी घेऊन घरात गेल्यावर चिमाबाई या काही वर्षे मागे गेल्या, म्हणजेच भूतकाळात हरवल्या.


 चिमा ही एक सुंदर सालस देखणी मुलगी. लहान वयातच लग्न झाले. सासर छान तोला मोलाचे मिळाले. इनामदार घराणे. त्यात भक्ती भावाची घरात परंपरा होती. त्यामुळे व्रत वैकल्ये, सणवार हे ओघाने आलेच.

हे सगळेच आता चिमाबाई ही आनंदाने करू लागली.तीलही त्या मध्ये श्रध्दा आणि भक्ती भाव निर्माण झाला.

अशातच पहिल्यांदा तिला बाळाची चाहूल लागली. घर सगळं आनंदी झाले. या गरोदरपणातील सगळे संस्कार यथोचित तिच्यावर केले. डोहाळ जेवणही राम मंदिराच्या आवारातच पार पडले. जणू त्याच्या आशीर्वादानेच.


 पुढे तिला मुलगा झाला. पण दुर्दैवाने तो जास्त दिवस जगू शकला नाही. खूपच थोडे आयुष्य त्याच्या वाट्याला आले. देवाने जसा दिला तसा परतही घेतला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

चिमाबाई आणि तिच्या पतीला ह्याचे खूपच दुःख झाले. पण, आई-वडील झाल्याची भावना यांना देवून ते बाळ निघून गेले. 

खूप खूप दुःख झाले या दोघांना.पण सांगणार कोणाला? 

एक एक दिवस जात होता. तसं तसं दुःख हलकं होत गेले. काही दिवसांनी परत चिमाबाईंना दिवस राहिले.जणू झाडाला पालवी फुटली उमलणाऱ्या स्वप्नांची!!


योग्य वेळी तिला मुलगी झाली. मातृत्वाच्या भावनेतून मग ती आई ही झाली. आणि जीवनात परिपूर्णता आली असे या दोघा मातापित्यांना वाटू लागली. जगण्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगला. बाळाभोवतीच या दोघांचे विश्व निर्माण झाले. पुढे मग ती परत दुसऱ्या मुलीची आई झाली. मग तिसऱ्या.. चौथ्या.. पाचव्या.. सहाव्या.. सातव्या..


असं बघून चिमाबाईंना खूप दुःख झाले. कारण घरात कीर्तनाचा वारसा होता. म्हणुन आजूबाजूच्या गावाची इनामदारी त्यांच्या कडे होती.’या कुल परंपरेला चालवायचे, म्हणजे पोटी पुत्र हवाच.’

हा विचार तीने केला.आणि ती माऊली सरळ रामाच्या पुढे जाऊन उभी राहिली.आणि समाधीतल्या रामदास स्वामींना प्रश्न तीने केला.”बघता आहात ना देवा!आफळ्यांची पुण्याई संपुष्टात आली आहे का?फळ मिळे पर्यंत प्रयत्न करत राहणारे ते आफळ! अन् आमच्या पदरी अपयश.आमच्या घराण्याची सेवा तुम्हाला नकोशी झाली आहे का?तर मी तुमचे उत्पन्न परत करीन.इतर गावी किर्तनाला दुसर्यांना मी पाठवणार नाही.मला मुलगा झाला तरच त्याला हा किर्तनाचा वाणवसा देईल.नाहितर हे उत्पन्न परत करून मी कोरान्न भिक्षा मागुन जगेन.”असं देवाला तीनं साकडं घातलं.

या माऊलीने केलेल्या प्रश्नांचा परिणाम मात्र देवावर झाला. त्यांनाही यांच्या घराची सेवा हवीच होती. स्वामींनी या माऊलीचा शब्द फुलासारखा झेलला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

आणि माघ कृष्ण नवमी या दिवशी म्हणजेच ‘रामदास नवमी’ या शुभ दिनी चिमा बाईंना पुत्ररत्नाचा लाभ झाला.तीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता.आज तिला खुप खुप धन्य वाटत होते.पण याच बरोबर एक अनामिक सत्यही त्यांना साद घालत होते. ते म्हणजे त्या दिवशी देवाशी केलेला संवाद.


म्हणून या मुलांमध्ये योग्य सुसंस्कारांची रुजवण करणे आवश्यक होते. योग्य मूल्यांचे त्याच्या मनावर शिंपण करणे ही गरजेचे होते. प्रेम आणि वात्सल्याबरोबरच त्याला वेळप्रसंगी कडक शिस्त लावून, त्याचे पालन आणि संगोपन करायचे होते.

या मुलाचे नामकरण झाले.’गोविंद’असे नाव ठेवले.


म्हणून या माऊलीने मुलाला म्हणजेच गोविंदला अगदी डोळ्यात तेल घालून, सुसंस्काराच्या जडणघडणीत घडवले.


गोविंद हा अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचा होता. शिक्षणाची आवडही होती.


एकदा त्यांच्या घरात मुंजीचा कार्यक्रम होता. घर सजले.. अंगण सजले.. रांगोळ्या काढल्या.. अंगणात मांडव सजला..

 बरीच पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी मांडवात हजर झाली होती. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

चिमाबाईने आधी गोविंदाला छान कपडे घालून तयार केले. त्यानंतर तो मांडवामध्ये इतर मुलांसोबत खेळू लागला. जमलेल्या पाहुणेमंडळी मधील एक व्यक्ती खेळणाऱ्या मुलांचे हात बघून भविष्य सांगू लागला.

 ‘ह्या मुलाचे उज्वल भविष्य आहे.’

 ‘हा मोठा कुणीतरी होणार आहे.’ असे सांगू लागला.

यामध्ये त्यांनी गोविंदाचाही हात बघितला आणि सांगितले,”अरे कोणाचा रे तू? तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही. तू दहावी पर्यंतही शिकतोय का नाही शंकाच आहे.अरेरे!!”

असं सांगितल्यावर एक जण मुद्दाम म्हणाला,

”मग हा काय आचारी होणार का साधासा पानक्या होणार??”

असं ऐकुन मग मुलं त्याला चिडवू लागली.

“पानक्या, पानक्या,” आचारी आचारी.”

हे असं मुलांचं चिडवणं बघून गोविंदाला अतिशय वाईट वाटले. आणि तो रडवेला चेहरा घेऊन आईकडे गेला. आणि आईला मग त्यांनी सगळे सांगितले. हे ऐकून आई तरातरा चालत येत सरळ त्या ज्योतिषी असलेल्या नातलगाजवळ गेली. आणि त्यांनाच तिने सवाल केला.

“तुम्हाला ज्योतिषातले काय कळते? अहो हातावरची रेषाच आहे ती. ती आपल्या कर्तबगारीनेही बदलता येते.समजले ना.”

हे ऐकून ती समोरची व्यक्ती चांगलीच खजिल झाली. त्यालाही क्षणभर वाटले, ‘की आपण हे काय बोलून बसलो आहोत?’


या घडून गेलेल्या प्रसंगानंतर चिमाबाई समोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले. म्हणून त्यांनी गोविंदाला सांगितले की,”परिस्थिती कशीही येऊ दे, पण शिक्षण सोडायचे नाही.”

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

आणि झाले ही असेच.घरातील आर्थिक परिस्थिती खुपच बेताची झाली.तरीही गोविंद ने शिक्षण सोडले नाही. प्रसंगी त्यानी कामेही केली.

शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर ही गोविंद ने मिळते कामं केले.माधुकरी मागितली.पण शिक्षणात खंड पडु दिला नाही.


असेच दिवस जात होते. गोविंदा हळूहळू एक एक वर्ग पुढे सरकत होता. आईचे बोलणे त्याने खरे केले मॅट्रिक उत्तीर्ण होऊन, त्यानंतर बीए ला पण चांगले मार्क्स घेऊन पारितोषिक ही मिळवले.पारितोषिक घेऊन आज तो घरी आला होता.


चिमा बाईंचे र्हदय आज भरून आले होते.जणु ते सुपायेवढे झाले होते.पोराने पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन आज तिच्या तपश्चर्येचेच फळ तिला मिळाले होते.

पुढे गोविंद ने बी.ए.नंतर एम.ए. आणि एल.एल.बी.ची पदवी ही प्रावीण्या सह संपादन केली. या सर्व यशाचे श्रेय गोविंद आपल्या आईला देतो.


पोवाडे गाण्याची गोविंदला विशेष आवड होती. म्हणून ते याचे कार्यक्रम करत गावोगाव फिरत होते. हे करत असतानाच त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका ही केलेल्या, त्यातही त्यांनी नाव मिळवले.

अनेक नाटकातही कामं केले.

 पण,” घराण्याची परंपरा असलेला कीर्तनाचा वारसा, हा तू जपायला हवास.”

असं आई म्हणाली.

“पण,आई मला ते येत नाही.आणि माझ्या या किर्तनाला कोण येणार बरं?”गोविंदने विचारले.

 तेव्हा “नभी जैसी तारांगणे,तैसे लोक तुझ्या किर्तनाला येतील."असा आईने आशिर्वाद ही दिला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

झाले मग काय गोविंदाने कीर्तनाची तयारी केली. आणि मग हळूहळू सुरुवात देखील केली. भगवत् भक्ती बरोबरच राष्ट्रभक्तीवर कीर्तन करणे त्यांचा आवडता विषय झाले. तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी विषय हाताळले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणांची आहुती हसत हसत देणाऱ्या वीर योद्धांची चरित्र ते आपल्या अमोघ वाणीतून लोकांसमोर मांडत. पुराणकथा, राष्ट्रीय चरित्रे, ही ते आपल्या ओजस्वी वाणीतून ऐकावीत असे.

 यामध्ये ते गहिवर दाटेल असा क्षण , कारुण्याचा क्षण, आपल्या खुमासदार विनोदी शैलीतून हास्याच्या खळखळाटाने आनंदात बदलुन टाकत असत.


ही चरित्रे रंगवताना, श्रोत्यांसमोर ती शब्दरूपात मांडताना, विज्ञानवादी दृष्टी ठेवून अंधश्रद्धेवर कडक टीका ते करत असत.

यांचे कीर्तन केवळ श्रवणीय नव्हते तर बघण्यासारखे सुद्धा होते. म्हणजे एकपात्री अभिनयाचा उत्तम दाखला होता.

गोविंद स्वामींचे किर्तन ऐकण्यासाठी भरपूर श्रोते जमू लागले प्रसंगी रस्ते ही त्यांना बंद करावे लागत होते.

पुढे त्यांचा 'किर्तनकेसरी ' म्हणुन गौरव केला गेला.

(सुप्रसिद्ध किर्तनकार गोविंद स्वामी आफळे.

यांच्या विषयी ही कथा आहे.)

(कथा आवडल्यास नक्की पेजला फॉलो करा 🙏.

कमेंट करा. लिंक ही इतरांना शेअर करा 🙏)

@सौ.शुभांगी सुहास जुजगर.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या