फॉलोअर

माझ्या माहेरीचे सुख भाग : २

 माझ्या माहेरीचे सुख भाग : २

 


मागील भागात आपण 'फलाट' ची माहिती बघीतली.आता पुढे..


स्वरा आणि स्वप्नीलने, त्या फलटावरून आधी हात फिरवला.

 "वा छान आहे ना भैय्या!" स्वरा स्वप्निलला म्हणाली.

 "आईऽ आम्ही याच्यावर बसू?" स्वप्निलने शीतलला विचारले. 

"हो बस ना. मी पण बसणार आहे."

 असं म्हणून शीतल पण त्यावर बसली.

 खूप छान तिला वाटत होतं. लग्नझाल्यापासून ती त्याच्यावर बसलेली तिला आठवत नव्हतं.

तिथं बसल्यावर सगळ्या लहानपणाच्या आठवणी, तिच्या मनात डोकावू लागल्या. 

ती मुलांना म्हणाली,

"मी अगदी रांगायला लागल्यापासून, यावर बसून खेळले आहे. मी आणि माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी, यावर बसून भातुकली पण खेळलो आहे. थोडे मोठे झाल्यावर, सागर गोट्याचा डाव, पण मी येथे खेळले."

 "हे 'सागर गोट्याचा डाव' म्हणजे काय?" मध्येच स्वराने विचारले. "अगं तुला सागरगोटे कशी आहेत? माहीतच नाहीत."

म्हणून तिने बाजूला पडलेले, छोटे छोटे खडे, म्हणजे जवळजवळ आवळ्याच्याआकारापेक्षा लहान, असे नऊ खडे गोळा केले. आणि फलाटावर बसून खेळूनही दाखवले. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात

"कळलं का? असं खेळायचो आम्ही, लहान असताना." स्वराने मान हलवली.

 "मला पण खेळू दे ना हे." असे ती म्हणाली.

 मग तिने चार-पाच वेळेस खडा वर फेकला. पण तो तिला झेलताच आला नाही. 

"मला येत नाही बाबा." असं म्हणून तीचिडली.

 "बरं जाऊ दे. मी तुला घरी गेल्यावर शिकवेन."शीतलने तीची समजुत काढली.


आणखी थोडं मोठं, म्हणजे नऊ दहा वर्षाची असताना.

 आठ घर मारून, चार पाच जणी मिळून हा खेळ खेळला जातो.


यामध्ये..

 "एक तळहाता एवढा चपटा दगड घेऊन, पहिल्या घरापासून सुरुवात करून, शेवटच्या घरातून तो सुखरूप बाहेर काढायचा. लंगडी घालत घालत.म्हणजे कोणत्याही घराच्या रेषेवर तो गेला नाही पाहिजे. किंवा त्याचा कुठलाच भाग रेषेला टच झाला नाही पाहिजे.तो आठही घरातुन बाहेर येऊन जेव्हा थांबतो, तेव्हा त्यावर लंगडी घालताना उचललेला पाय ठेवायचा.असे एक एक करत आठही घरासाठी हे करायचे.या खेळातही आम्ही चार पाच जणी असायचो.जीचे पहिल्यांदा सर्व खेळुन झाले आहे.ती जिंकली.आणि जीचे झाले नाही. तिच्या वर राज्य." हे ऐकताना स्वरा आणि स्वप्नील मख्ख चेहऱ्याने तिच्या कडे पाहत होते.

 "हे तुम्हाला नाही कळणार. बेटा तु अजून लहान आहे."

एवढे सांगून झाल्यावर शीतलची आई म्हणाली, "ये चल आता मधी. किती वेळ येथेच बसणार आहे?" असे म्हणून त्या मध्ये जायला निघाल्या.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात

 वाड्याचे मोठे दार..

 या दाराला बाहेरून मोठे मोठे मशरूम सारखे खीळे बसवलेले आहेत. आणि आतून लावण्यासाठी कडी तर आहेच. आणि एक मोठे लाकूड आहे. त्याला 'आगळ' असे म्हणतात. या वाड्याची भिंत म्हणजे,आपल्या दोन्ही हाताची लांबी, जेवढी होईल तेवढी. तेवढ्या जाडीची ही भिंत. या भिंतीत संपूर्ण आगळ बसेल एवढी देवळी.

 म्हणजे, आगळीला आपण खांब म्हणुन यात. म्हणजे दरवाजाच्या रुंदी पेक्षा हा मोठा. रात्री दार लावल्यावर ही आगळ या भिंतीतुन त्या भिंतीत सरकवली जाते. यामुळे रात्रीची अजिबात भीती उरत नाही,नव्हती.पुर्ण सुरक्षित.


*****

वाड्यात गेल्यावर शीतलने आवाज दीला.

"मनुवहिनीऽ मनुवहिनीऽ"

एवढ्यात त्यांची मुलगी बाहेर आली. म्हणाली,

"आई घरात नाही. मी बोलावून आणते. तुम्ही बसा तोपर्यंत." असं म्हणून, ती आईला बोलवण्यासाठी गेली.

 "शीतलने आपल्या मुलांना तोपर्यंत घर दाखवले.

 स्वप्निल ने सांगितले,"आई हे घर नाही. हा तर किल्ला आहे. मला पप्पांनी असाच किल्ला दाखवला होता."

"हो बाळा, या घराला 'लादनी' असे म्हणतात. हे पूर्ण दगडांचे बांधलेले आहे. अर्धेगोल आकाराचे हे छत म्हणजे स्लॅब आहे. हे बांधकाम पुर्ण दगडाचे आहे. ही समोरचीलादनी आहे. याच्या पाठीमागे ही आणखीन एक आहे. म्हणजे दोन ओळी. अशाच या वाड्यात आठ लादन्या आहेत. पूर्वी यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करत असत.आणि याच्यावरती घर बांधून त्यात ती स्वतः राहत असत."शीतल.

थोडं थांबून…

"मी तुमच्या एवढी असताना म्हणजे. जन्मल्यापासून लग्न होईपर्यंत. याच लादनीत राहिलेले आहे. माझे लहानपण, बालपण, आणि माझे लग्न ही येथेच झाले आहे. येथेच पडले, धडपडले, मारही खाल्ला, शाब्बासकीही मिळाली."

 शीतल बोलत असताना मध्येच स्वरा म्हणाली, "आई, कोणी मारले गं तुला?" तिचा हा प्रश्न ऐकून शीतल तिच्या आईकडे पाहू लागली. 

मग आई म्हणाली, "मी मारले मी, तुझ्या आईला. तेव्हा ती माझी लहान मुलगी होती. आता ती तुझी आई झाली."

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात

" मग तु का मारलं माझ्या आईला पण?" स्वरा

रागाने म्हणाली. 

"तुझी आई लहान असताना, मला खूप त्रास द्यायची. तु नाही का तुझ्या आईला त्रास देत, तसा. मग मी तिच्या पाठीत धपाटे घालायचे. हे बघ असे." म्हणून आईने शीतलच्या पाठीत दोन धपाटे घातले.

"ए मारू नको ना माझ्या आईला. मी नाही त्रास देत तिला. हो की नाही आई." असं तिने शीतलला विचारत, तिचे दोन्ही इवलाले हात, शीतलच्या चेहऱ्यावरून माया केल्यासारखे फिरवले.

 मायलेकीचे हे हितगुज, चालू असतानाच मनू वहिनी आल्या. मग हळूहळू गप्पा सुरू झाल्या.

" काय चालू होतं मायलेकीचं?"असं त्यांनी विचारले.

 "माझ्या लहानपणीच्या आठवणी मुलांना सांगत होते. या घरातल्या.लादनीतल्या."शीतल.


"हो काऽ, मग स्वरा, तू रहा इथेच दोन दिवस." स्वराचा हात हातात घेत मनुवहिनी म्हणाली. "नाही, आम्ही नाही राहणार." हात सोडवत स्वरा म्हणाली.

 "रहा ना. बघ इथे कसं गार गार वाटतय. मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात देखील, या लादनीत फॅन लावला तरी, एसी लावल्यासारखे गार वाटते. आणि हिवाळ्यात छान उबदार वाटते. बाहेर गेले की थंडी वाजते आणि या घरात म्हणजे लादनीत आले की छान मायेच्या उबीत आल्यासारखे वाटते." 


हे पाहून हे ऐकून स्वप्निल म्हणाला,"असं कसं हो मामी?"

असं कसं हो मामी?असा प्रश्न स्वप्निलने विचारला आहे..


"असं कसं हो हे मामी?"


स्वप्निलच्या या प्रश्नाचे उत्तर मामीने दिले.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात

"तेव्हाच्या लोकांनी, म्हणजे आपल्या पूर्वजांनी, जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वीचा काळ तो. तेव्हा आर्थिक सुबत्तेपेक्षा धान्य समृद्धीच जास्त होती. आणि ही धान्य वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळ सुस्थितीत राहावे. म्हणून हे असे बनवलेले असणार."


 यावर शीतलची आई म्हणाली," होऽ माझे लग्न झाले तेव्हा, मधल्या लादनीत, म्हणजे सगळे धान्याचेच पोती ठेवलेले असायचे. गहू, ज्वारी, बाजरी या धान्याच्या पोत्यांच्या थप्प्याच्या थप्प्याच या लादनीमध्ये होत्या.कारण येथे धान्य खूप सुरक्षित राहत होते. त्याला कीड लागत नव्हती. म्हणजे ते धान्य वर्षापेक्षाही जास्त वर्ष चांगले राहायचे. चांगले स्थितीत राहायचे. तेव्हा शेती भरपूर होती आपल्याला. त्यामुळे गडीही कामाला होते. त्यांनाही वर्षभर धान्य पुरवावे लागत होते. मधल्या लादनी तून धान्य काढायचे, समोरच्या लादनीत दळण करायचे. आणि लगेच दळण्यासाठी गिरणीत पाठवायचे. हे झाले आमच्याकडे काळी. पण त्यापूर्वी च्या काळात, बाहेरच्या लादनीत दळण करायचे, आणि तेथेच रोवलेले जाते होते. त्यावर धान्य दळून घ्यायचे, तयार पीठच वरती घेऊन जायचे."


 यानिमित्ताने आईनेही तिच्या आठवणींना उजाळा दिला.


"आता हे 'रोवलेले जाते' म्हणजे काय आहे?" स्वप्निलने हा प्रश्न विचारला.


"आता तुला काय सांगू जाते म्हणजे?" शितल म्हणाली.


 यावर लगेच मनु वहिनी म्हणाली, "अरे बाळा, जातं म्हणजे.. म्हणजे चल मी तुला दाखवून आणते. चल स्वरा तू पण." असं म्हणून तिने दोघांनाही बरोबर घेतले. आणि शेजारच्या तळघरात घेऊन गेली. 




हे तळघर म्हणजे यांच्या वाड्याच्या शेजारील घर. तीन वाडे शेजारी, एका लाईनीत. यांचा मधला वाडा. यांच्या पलीकडे म्हणजे तळघर. तेथे काकीने छान जाते रोवलेले होते. ते या मुलांना दाखवले.


" हे बघा रे, याला जातं म्हणतात."


 " नाही मामी, याला रोवलेले जाते म्हणतात.


 स्वप्निल नेदुरुस्ती केली.


"हो. हे बघा फक्त दगडाचे आहे ना, त्याला जाते म्हणतात. हे एकावर एक असे चपटे गोल, म्हणजे गाडीच्या चाकासारखे दोन दगड आहेत. या वरच्या गोलला गहू ज्वारी यासारखे धान्य टाकायला हे एक छिद्र आहे. आणि धान्य टाकल्यावर त्याला ओढण्यासाठी येथे एक लाकडाची खुंटी ठोकलेली आहे. तिला धरून असं फिरवायचं. कळलं का?"


"मला पण फिरवायचं." स्वरा म्हणाली.


 "धर. धर. बघू हलते का?काकीने स्वराला म्हटले.


"शीतलचे मुलं आहेत का हे?"असे त्यांनी मनुवहिनी ला विचारले. 


मग त्यांनीच जात्यात थोडंसं धान्य टाकून…


 "हे असं फिरवले, की मग या इथून टाकलेल्या धान्याचे हळूहळू पीठ पडते. मग ते पीठ आपण भरून घ्यायचे. मग त्याची पोळी किंवा भाकरी करायची." असं काकीने जातं फिरवता फिरवता सांगितले.


जात्यातुन पीठ पडताना बघुन स्वरा खुदकन हसली.आणि तिने टाळ्यांही वाजवल्या.




घरी येऊन दोघेही शीतलला जात्याविषयी सांगु लागली.


"आई असे छोटे छोटे दोन गोल, म्हणजे माझ्या सायकल च्या चाकाएवढे.."


स्वप्निल चे बोलने मध्येच थांबवत स्वरा म्हणाली,


"आणि आई, ते फिरवलं की मग खाली पांढरं पांढरं पीठ पडतं.मी पाहीलं नाऽ"


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात


हे सांगत असताना बाहेरून खेळता खेळता संस्कार आणि समृद्धी आले.म्हणाले,


"शीतल आत्या,शीतल आत्या, आम्ही यांनाबाहेर खेळायला घेऊन जावु का?"


स्वराकडे बोट दाखवून संस्कार म्हणाला.


"ये जा, दोघेही त्यांच्या सोबत खेळायला.पण तुम्ही काय खेळत आहात?"शीतल.


"आम्ही ना 'मामाचे पत्र हरवले' हा खेळ खेळत आहोत." समृद्धी म्हणाली.


"अरे वाऽ वाऽ खुपच मस्त.ये जारे मुलांनो खेळायला त्यांच्या बरोबर."


आईने सांगितले म्हणून ही दोघेही बहिण भाऊ अनिच्छेनेच बाहेर खेळायला गेले.


तर वाड्याच्या समोरील पटांगणात बरीच मुलं गोल रिंगण करून बसलेली होती.सुट्टीचे दिवस होते.म्हणुन काहीजण मामाच्या गावाला तर काहीजण मावशीच्या गावाला आलेले होते.




काही वेळातच स्वरा 

आणि स्वप्निलही या खेळात दंगुन गेली.


                 ।।समाप्त।।


  भाग १


 


सौ. शुभांगी सुहास जुजगर.

(ही कथा पुर्ण काल्पनिक आहे🙏🏻)

                 





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या